लाडके दैवत गणपती.


गणेश चतुर्थी (गणेशोत्सव)



अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे.







यादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा आहेत. काही कथांनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला. काहीनुसार या दिवशी म्हणजेच भादपद चतुर्थीला त्याने गजासुराचा नाश केला. ते काहीही असो पण या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस विघ्नहर्ता गणेशाची, त्याला घरी आणण्याची प्रथा रुढ झाली.







या दिवशी गणेशमूर्ती घरी आणतात. ती पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करू ठेवतात. पुजेला चंदन, दूर्वा, केतकी, तुळस, शेंदूर वगैरे एकवीस प्रकारची पत्री महाभिषेक करून भक्तीभावाने आवाहन, आसन, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुण्य, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प अशा सोळा उपचारांनी जाणकार व्यक्ती पूजा करते. फक्त याच दिवशी गणपतीला तुळस वाहतात. नंतर सुखहर्ता दुखहर्ता आरती म्हणतात. आरतीनंतर शमी, केतकी, दूर्वा, शेंदूर वाहून मोदकांचा नैवद्य वाहतात. घरोघरी आपापल्या परंपरेनुसार दीड, पाच, सात अथवा दहा दिवस गणपती बसवतात व विसर्जनावेळी समुद्र, नदी किंवा तळयात दोन वेळा बुडवून वरखाली करतात व विसर्जन करतात.







गणपती ही विज्ञान देवता आणि सामाजिक देवतासुद्धा आहे. कोणत्याही कार्याची सुरवात गणेशपुजेने होते. श्रीगणेश हे एक तत्व आहे. ब्रह्म आहे. आत्मा आहे. गणपती हे ज्ञानाचे, विज्ञानाचे रुपक आहे. स्वरूप आहे.







गणपती शेतीचे रक्षण करतो. त्याचे शूपकर्ण म्हणजे धान्य पाखडण्याचे सूप आहे तर त्यांचा एकदंत म्हणजे शेतीसाठी आवश्यक असा नांगराचा फाळ आहे. गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा ह्या ओषधी आहेत. त्या अतिशय थंड असतात. टॉयफाईड वा उष्णतेच्या विकारांमध्ये दुर्वेचा रस अतिशय लाभदायी ठरतो.







लोकमान्य टिळकांनी घरोघरी पूजल्या जाणाऱ्या या सार्वजनिक गणनायकाची १८९२ साली नगरच्या चौकात प्रतिष्ठापना करून सामाजिक गणेशोत्सवाची सुरवात केली. लोकमान्यांनी सामाजिक, अध्यात्मिक व वैचारिक असा त्रिवेणी संगम साधून लोकजागृती केली. समाजामध्ये एकता व संघटन निर्माण केले. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात गणेशोत्सवाचे योगदान अतिशय मोलाचे ठरले आहे. म्हणूनच गणपती ही एका अर्थाने सामाजिक देवतासुद्धा आहे.







तरी या पवित्र दिवशी आपण ज्ञानी, संयमी, सदगुणी होण्याचा निश्चय करुया. आपले वैयक्तिक व सामाजिक कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचा निर्धार करूया हाच खरा गणेशचतुर्थीचा संदेश आहे.



गणेश संकल्पनेचा ऐतिहासिक मागोवा



गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम् हवामहे... [२] व विषु सीदा गणपते...[३] ) वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप उद्भवल्याचे अनेक संशोधक मान्य करतात.[४]




ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पती, वाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुर्‍हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशिर्वादाविना कोणतीही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.[५]



दुसर्‍या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनपूर्व आठव्या शतकापासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लिहिल्या गेलेल्या बौधायण धर्मसूत्रात गणेशाचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.



मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे. पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय. गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो. अनेक पुराणे स्वयम्भू मानतात.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील 'भूमारा'त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे ह्त्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या ह्त्तीमुखाचे हेही कारण असावे. पुराणांमध्ये ह्त्तीमुखधारी यक्ष आहेत. यक्ष हे गणपती प्रमाणे लंबोदर असतात.



'याज्ञवल्क्य संहिता' या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते.इसवीसनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव-ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे.


पुराणांतील जन्मकथा


शिवपुराण – शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास दारी नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिज शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्तिली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.[७]


स्कंदपुराण – स्कंदपुराणात- गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहेत. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुण्डहीन अवस्थेत जन्माला आले. नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते स्वतःच्या शरिरावर चढवले.

स्कंपुराणाच्या- ब्रह्मखण्डातील कथेनुसार, पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुन्दर व पूर्णांग पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले व त्यास आपला द्वारपाल नेमून ती स्नानास गेली. नंतर तेथे येऊन स्नानागारात जाणा-या शंकरास बालकाने अडवले. शंकरासोबतच्या युद्ध झाले व त्यात शंकरांनी बालकाचे मस्तक छिन्न केले.[८] या नंतर गजासुराचा वध करून शंकरांनी त्याचे मस्तक बालकाच्या धडावर बसवले.

स्कंदपुराणाच्या- अर्बुद खण्डात म्हटले आहे की, पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला. कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुण्ड आणले. पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले. यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले. गजमुण्डयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला. शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशिल व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशिर्वाद दिला. कार्तिकेयाने त्यास कुर्‍हाड दिली. पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला.



बृहद्धर्मपुराण – बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली. पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरानी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने चुंबन करण्यास सांगितले.[९] पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले. मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले. यामुळे पार्वती शोकाकुल झाली. या वेळी उत्तरदिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली. तद्नुसार पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले. नंदीने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले. शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले. शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले.



शिव व पार्वती गणेश बाळास न्हाऊ घालताहेत, कांडा चित्रकला - १८ वे शतकब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, शंख-चक्र-गदा-पद्मधारी कृष्णास पाहून मुग्ध पार्वतीने तशाच एका पुत्राची कामना केली. कृष्णाने तसे वरदानही दिले. एकदिवस जेव्हा शिव-पार्वती स्वगृही क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मणरूपात भिक्षा मागण्यास आला. पार्वती त्यास भिक्षा देण्यास गेली असता शंकराचे वीर्यपतन झाले व तेथे कृष्ण स्वतः शिशुरूपात अवतीर्ण झाला. वृद्ध ब्राह्मण अंतर्धान पावला. पार्वती ह्या शतचन्द्रसमप्रभम् बालकास पाहून आनंदित झाली नंतर देवता व ऋषिगण बालकास पाहण्यास कैलासी आले. त्यात शनीदेवही होता. शनीने आपल्या कुदृष्टीची गोष्ट पार्वतीस सांगितली पण पार्वतीच्या आग्रहाने शनी बालकास बघण्यास तयार झाले. पण शनीने भीतीने केवळ डाव्या डोळ्यानेच बालकाकडे बघितले. पण तेवढ्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुण्ठात कृष्णाच्या देहात जाऊन विलिन झाले. पार्वती शोकाने बेशुद्ध झाली. तेव्हा गरुडावरून जाणा-या विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तरदिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले. त्याचे मस्तक ऊडवल्याने हत्तीणी व तिचे बाळ रडू लागले. तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून दोन मुंडकी तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघंना जीवित केले.[१०] शंकरांच्या आशिर्वादाने गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला. पार्वतीच्या आशिर्वादाने तो गणांचा पती,विघ्नेश्वर व सर्वसिद्धिदाता झाला. यानंतर एकेकाळी कार्तिकेयास देवांचा सेनापती नेमताना इन्द्राचा हात आखडला. शंकरास याचे कारण विचारले असता, गणेशाची अग्रपूजा न झाल्याने असे घडले असे सांगितले.

ब्रह्मवैवर्त पुराणातील आणखी एका कथेनुसार, माली आणि सुमाली नामक दोन शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशूळाने आघात केला. म्हणून सूर्य अचेतन होऊन जग अंधारात बुडाले. सूर्यपिता कश्यपाने शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल. यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक जोडले.

पद्मपुराण – पद्मपुराणानुसार, शंकर पार्वती ऐरावतवर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला.

लिंगपुराण – लिंगपुराणानुसार, देवगणांनी शंकरापाशी येऊन असूरांपासून स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली. तेव्हा शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला.[११]



राजा रवि वर्मा कृत 'ऋद्धि सिद्धि' चित्रातील सपत्नीक गणेशवराहपुराण – वराहपुराणानुसार , देव व ऋषिगण शंकरापाशी येऊन विघ्ननिवारणासाठी नव्या देवतेची मागणी केली असता शंकराजवळ एक बालक प्रकट झाला. देवगण, पार्वती बालकास पाहून मुग्ध झाले. पण शंकर क्रोधित झाले. त्यांच्या शापाने बालकास गजमुख, लांबडे पोट व पोटाशी नाग प्राप्त झाला. क्रोधित शंकरांच्या घामातून अनेक गणांनी जन्म घेतला. गणपती त्यांचा अधिपती झाला.[१२] या ठिकाणी गणपतीचा गणेश, विघ्नकर व गजास्य म्हणून उल्लेख आहे.

देवीपुराण – देवीपुराणानुसार, शंकरांच्या राजसिक भावामुळे हातातून घाम स्त्रवला व त्यातून गणपतीचा जन्म झाला.

मत्स्यपुराण – मत्स्यपुराणानुसार, पार्वती चूर्ण (भुकटी) स्वतःच्या शरिराचे मर्दन करत होती. याच भुकटीपासून तिने गणपतीची मूर्ती बनवली व गंगेत टाकली. पुतळा मोठा होत होत पृथ्वीइतका झाला. नंतर या मुलास गंगा व पार्वतीने पुत्ररूप मानले व ब्रह्माच्या आशिर्वादाने हा मुलगा गणाधिपती झाला.

वामनपुराण – वामनपुराणानुसार, पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगमळापासून चतुर्भूज गजानन मूर्ती निर्मिली व महादेव त्यास पुत्र मानून म्हणाले मया नायकेन विना जातः पुत्रकः (मला सोडूनही पुत्र जन्म झाला) त्यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध होईल व विघ्ननाशकारी होईल.

इतर आख्यानेब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून कैलासी आले असता, द्बाररक्षक गणेशाने त्यांस अडवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला.

शिवपुराण – शिवपुराणानुसार, गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते. तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वीपरिक्रमा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीपरिक्रमेस गेला. गणपतीने शंकर पार्वतीस सातवेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वीपरिक्रमा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या दोन मुलींसोबत - रिद्धी(बुद्धी) व सिद्धीसोबत गणेशाचा विवाह झाला. लक्ष्य हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय.विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दु:खी कार्तिकेय क्रौञ्च पर्वतावर राहण्यास गेला. आणखी एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छित होती. गणपती ब्रह्मचर्यव्रती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानवपत्नी होशिल असा शाप दिला. तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला.

तन्त्र – तंत्रमतानुसार लक्ष्मी व सरस्वती या गणपतीच्या पत्नी होत. याखेरीज तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या गणेशाच्या इतर नऊ पत्नी होत.

महाभारत – महाभारतामध्ये, कौरव व पाण्डव यांच्या मृत्युनंतर व्यास ध्यानास बसले. महाभारताच्या सा-या घटना त्यांना आठवू लागल्या. तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला. यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती. ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले. गणपती लेखनिक होण्यास तयार झाला. पण त्याची एक अट होती - लिहिताना लेखणी थांबू नये. व्यासांनी उलट अट सांगितली - अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये.[१३] यासाठी व्यासांनी महाभारतात ८८०० कूटश्लोक समाविष्ट केले. या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोकरचना करण्यासाठी अवसर मिळाला.

अवतार
उपपुराण मानल्या जाणा-या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.




गणेश पुराण – गणेश पुराणात- उल्लिखित गणपतीचे चार अवतार सत्य, त्रेता, द्बापर व कलीयुगात अवतीर्ण झाले. हे होते -

महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप व अदिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला.[१४] या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असूर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.

मयूरेश्वर – हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.

गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला.अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.

धूम्रकेतु – द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलीयुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.

मुद्गल पुराण – मुद्गल पुराणात- गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे -

वक्रतुण्ड – प्रथम अवतार.वाहन सिंह. मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध केला.

एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक. मूषकवाहन.अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध।

महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.

गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.

लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक.वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.

विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.

विघ्नराज – विष्णूचे प्रतीक.ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य.

धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा.अभिमानासुराचा नाश केला.